राज्यात अनेक उलटसुलट घडामोडी घडल्यानंतर अखेर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, अन्य ६ मंत्र्यांचा शपथविधीही झाला. यानंतर काही वेळातच मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी मंजूर केला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात चांगले सरकार देऊ, दहशत वाटेल असे वातावरण होऊ देणार नाही असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ज्या योजना जाहीर केल्या त्याचे वास्तववादी चित्र समोर आणावे, असे आदेश उद्धव ठाकरेंनी मुख्य सचिवांना दिले आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देणार नाही, भव्य दिव्य मदत करू. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करू असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मंत्रिमंडळ हे राज्याचे आहे हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. आमचे महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे राज्यात दहशत वाटत असेल असे वातावरण राहणार नाही. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या फडवणुकीचा पाऊस पडला. आता मात्र, शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.