सिंधुदुर्ग – जिल्ह्यात दोन दिवस धुवाधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे करुळ घाटात विश्रांती हॉटेल नजिक रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, गोवा या कोकण भागांना कोल्हापूरसह घाटमाथ्याला जोडणारा हा प्रमुख घाटमार्ग आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने जोरदार मूसंडी मारल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका भात शेतीवर बसला असून बहुतांशी भात शेती पाण्याखाली गेली आहे. घाटरस्ते तर ‘डेंजरझोन’ बनले आहेत. गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात हॉटेल विश्रांती नजिक रस्ता खचल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान वैभववाडी पोलिस व बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून या ठिकाणी बॕरल व बॕरिकेट्स लावले आहेत.
कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणा-या प्रमुख मार्गापैकी वैभववाडी तालुक्यातील करुळ हा एक घाट. घाटात धोकादायक दरडी, तुटलेले संरक्षण कठडे, रस्ता खचण्याचे वाढते प्रमाण पाहता हा घाट आता अवघड वाटच बनू लागला आहे.सिंधुदुर्ग जिह्यातून घाट माथ्यावर जाणाया प्रमुख मार्गापैकी वैभववाडी तालुक्यातील करुळ घाट. सुमारे ३५ वर्षापुर्वी निर्मिती झालेला हा मार्ग आहे. मात्र दिवसेंदिवस हा मार्ग ढासळत चालला आहे. या मार्गावरुन दररोज ३२ हजार टन मालाची वाहतूक होते. तळकोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा सुखकर मार्ग आहे. मात्र गेले काही वर्ष बांधकाम विभागाकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे हा मार्ग बिकट वाट बनत आहे.