सिंधुदुर्ग – गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस वेंगुर्ले तालुक्यात कोसळत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आज सकाळी अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले होते. शिरोडा बाजारपेठेत पावसाचे पाणी वाढल्याने काही दुकानांमध्ये हे पाणी घुसल्याने नुकसान झाले. तर कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने २७ गावांचा अजूनही संपर्क तुटलेला आहे.
आज सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने रौद्ररूप धारण केले होते. अनेक मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने त्या त्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. दरम्यान शिरोडा येथील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाणी घुसल्याने दुकानचे मालक बादलीने पाणी उसपुण काढत होते. दुकाने साफ करत होते. तर काही दुकानांमध्ये पाणी जास्त गेल्याने पंपाद्वारे पाणी दुकानातून बाहेर काढण्यात येत होते पाऊस मोठा पडत असला तरी पाणी वाहून जाणारे गटार अरुंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. मातीने तुंबलेली गटारे साफ करणे व गटांची रुंदी वाढविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. गटारांची रुंदी वाढवण्याची मागणी व्यापारी करीत आहेत. जोराचा वारा पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा खेळखंडोबा होत आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने दोन दिवस शिरोडा परिसरात लाईट गायब झाली आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाने तालुक्यातील काही घरांचीही पडझड झालेली आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. दोन दिवस भ्रमणध्वनी, दूरध्वनी व इंटरनेट सेवा बंद होती त्यामुळे बँक व इतर व्यवहार होऊ शकले नाहीत.
माणगाव खोऱ्यात मंगळवारी पासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माणगांव साळगाव दत्त मंदिर रोड वर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली आंबेरी पुलावरही पाणी आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला रात्री पावसाने जोर केल्यामुळे पुलाच्या अलीकडील भाग पूर्णतः कोसळून वाहतूक ठप्प झाली गेल्या वर्षी याच पुलासाठी आमदार वैभव नाईक यांनी सहा कोटी रुपये मंजूर करून भूमी पूजनाचा कार्यक्रम केला होता यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या अभिनंदनाचा फलक लावून भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला मात्र माणगांव खोऱ्यातील सुमारे सत्तावीस गावांचा प्रमुख दुवा असलेला आंबेरी पूल पावसात वाहून गेल्यानंतर बांधणार काय असा प्रश्न माणगाव वासियांना पडला आहे



