रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला त्याचा चार महिन्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्याला पोलीस देखरेखीखाली उपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी वारिशे यांना गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप आंबेरकरवर असून तो सध्या कारागृहात आहे. जानेवारी २०२६ मध्ये मिळालेल्या सहा आठवड्यांच्या जामिनाची मुदत संपल्यानंतर आंबेरकर याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाण्यास परवानगी आणि चार महिन्यांचा जामीन मागितला होता. मात्र, सरकारी पक्षाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि साक्षीदारांवर दबाव येण्याच्या शक्यतेचा दाखला देत याला तीव्र विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आरोपीला तातडीने जामिनावर सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तात खासगी रुग्णालयात उपचार घेता येतील, असे न्यायालयाने नमूद केले आहे.



