शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी ५०-५० फॉर्म्युलाप्रमाणे मुख्यमंत्री ठरवू असं सांगितलं आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विधानसभेसाठी ठरलेल्या फॉर्म्युलावर चर्चा करुन निर्णय घेऊन मग सरकार स्थापनेचा दावा करु अशी माहिती दिली. ठाकरे यांच्या या विधानावरून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपामध्ये जुंपण्याची शक्यता दिसत आहे.
मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी ५०-५० चा फॉर्म्यूला ठरला होता. चंद्रकांत पाटील यांनी जागावाटप होताना उद्दव ठाकरे आमच्या अडचणी समजून घेतील अशी भावना व्यक्त केली होती. पण सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. मलादेखील माझा पक्ष पुढे न्यायचा आणि वाढवायचा आहे”. हा भाजपाला इशारा आहे का असं विचारलं असता, इशारा नाही तर जे ठरलं होतं त्याची आठवण करुन देत आहे असंही ते म्हणाले.