साहित्यानंद प्रतिष्ठान च्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कवी संमेलन

0
135

साहित्यानंद प्रतिष्ठान च्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कवी संमेलनात सिंधुदुर्गातील कवींनी आपल्या कवितांतून मानवतेचा जागर केला. “आपलं जगणं आणि आपली कविता या दोन गोष्टी एकमेकांशी प्रामाणिक असतील तर आपली कविता निश्चितच साहित्य क्षेत्रात आपलं ठळक अस्तित्व निर्माण करते त्यासाठी कवीने स्वप्रेमातून बाहेर यायला हवे. जात-धर्माच्या बंदिस्त तटबंदी नाकारून केवळ माणूस या भूमिकेतून आपण काव्य लेखन करायला हवं . तरच आपल्या कवितेच्या कक्षा रुंदावत जातात, असे विचार आपल्या अध्यक्षीय मनोगतात कवयित्री सरिता पवार यांनी मांडले.
साहित्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्र परिवर्तनदिनानिमित्त सिंधुदुर्गातील कवींचे ऑनलाइन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनात बुद्धाच्या अहिंसा, प्रेम, शांतीचा वारसा पुढे नेणाऱ्या..धम्मा च्या विचारांचे आजच्या जगाशी असलेले नाते सांगू पाहणाऱ्या आणि माणसातील माणूसपण ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या कवितांनी हे आजचं कविसंमेलन सिंधुदुर्गातील कवितेच्या समृद्ध परंपरेशी जोडून घेण्यात यशस्वी ठरले.
कवयित्री रिया पवार यांच्या ” बाबा तुझ्या लेकरांत आता परिवर्तन घडतंय ” या सकारात्मक भावना जागविणाऱ्या कवितेचा धागा पकडून ” रंगांचा जन्म जातीजातीत कधी झाला ?” असा समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या अमोल तांबे यांच्या अस्वस्थ कवितेपर्यंत कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. सध्याच्या समाजातील स्त्री अत्याचार हा स्वतःतील माणुसपणाला आवाहन करणारा ज्वलंत प्रश्न कवी श्रेयस शिंदे यांनी ” हे देव्हाऱ्यातील आदिमाये ” या कवितेतून अनोख्या पद्धतीने मांडला. आर्या बागवे यांच्या कवितेतील ” तू नरकातच पडशील रक्तबंबाळ होऊन..शाप आहे या कळीचा तुला ” हा उद्वेग हृदयद्राव्यक होता. मनस्वी महादेव यांची ” लॉकडाऊन मधील आई ” सर्वानाच बालपणीची आठवण देणारी होती. राकेश चौहान यांची ” स्वातंत्र्याच्या भुवरती स्वीकारलेल्या गोड गुलामीत सुखावतोय ” असे सांगणारी धीरगंभीर कविता अधांतरी समाजव्यवस्थेला संबोधित करणारी ठरली. ऋषिकेश अंकुशराव यांनी कोकण सोडुन गेलेल्या लोकांप्रति चीड व्यक्त करत ” कोकण नगरी ” ही कविता सादर केली. आदेश कदम यांनी ” जागवा आता माणसांत एक एक बुद्ध ” ही कविता आपल्या पहाडी आवाजात सादर केली. उदय सर्पे यांनी ” जयभीम ची सावली ” या कवितेतून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हृद्यपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. “जातीच्या आणि धर्माच्या पल्याड जाऊन कलाकाराने घ्यावा एकदा तरी मोकळा श्वास… ” ह्या आशावाद जागवणाऱ्या कवितेने सागर कदम यांनी कवी संमेलनात आपली मोहोर उमटवली. तर अध्यक्षीय समारोपावेळी कवियत्री सरिता पवार यांनी आपल्या ” दांभिक आस्तिकतेची द्वाही ” या कवितेतून डोळस नास्तिकतेबाबत अंधश्रद्धाळू आस्तिक करत असलेल्या हस्तक्षेपाना माणुसपणाने सामोरे जाण्याची गरज अधोरेखित केली. या कविसंमेलनाचे प्रास्ताविक साहित्यानंद प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अमोल तांबे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश चव्हाण यांनी केले. आभार सागर कदम यांनी मानले. या संपूर्ण कवी सम्मेलनाला साहित्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा विजय वडवेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here