सिंधुदुर्ग – राज्यातील कोणत्याच विषयावर चर्चा व निर्णय घेण्यापासून हे ठाकरे सरकार पळत असून दोन दिवस अधिवेशन ठेवुन श्राद्ध उरकावे तसे अधिवेशन उरकणार असल्याने हे सरकार अधिवेशनापासून पलायनवादी सरकार असल्याचा आरोप माजी शिक्षण मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत करीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार हा चिंताजनक व संतापजनक असल्याचाही आरोप त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर केला.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले आमदार आशिष शेलार यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती, कोरोना केअर सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली, आरोग्य यंत्रणेची माहीती घेतल्यानंतर येथील आरोग्य यंत्रणेचे चित्र हे निराशाजनक, चिंताजनक व काही ठिकाणी संतापजनक आहे. आरोग्य यंत्रणेतील तज्ञ डॉक्टरांची पदे काही काळापुरतीच भरण्यात आलेली आहेत, आरोग्य यंत्रणा अतिशय ढिसाळ पद्धतीची आहे, येथील पालकमंत्री धीर द्यायला जिल्ह्यात दिसत नाहीत. मदत देण्यापेक्षा शिवसेनेचे आमदार राडा करताहेत.
जिल्ह्यात आलेल्या निसर्ग वादळाची, तौक्ते वादळाची जलद पाहणी करणार्या मुख्यमंत्र्यांनी 252 कोटी नुकसान झाल्याचे घोषीत केले मात्र या दोन्हीही वादळाची तसेच भात खरेदी बोनस, अवकाळी पावसाची अशा विविध नुकसान भरपाई देण्यास हे सरकार वारंवार विसरत आहेत त्यामुळे ठाकरे सरकार रात्रीस खेळ चाले मधील पांडू आहे तसा विसारलय असे झाले आहे.
झोपलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करायचे तर कोरोनाच्या परिस्थिती ते योग्य नाही. या बाबत अधिवेशनात प्रश्न मांडावे तर हे सरकार कोरोनाचा वापर करून केवळ दोन दिवस अधिवेशन ठेवून श्राद्ध उरकण्या सारखे करू पाहताहेत. त्यामुळे कोणत्याही विषयावर त्यामुळे चर्चा, निर्णय होणार नाही.