निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या वाऱ्याचा वेग अधिक असल्याने हे चक्रीवादळ भीषण रूप धारण करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच 11 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीजवळील भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात NDRF च्या पाच तुकड्या, तटरक्षक दल आणि नागरी सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अलिबागमध्ये NDRF ची 3 पथके, श्रीवर्धन येथे 2, मुरुड येथे तट रक्षक दलाचे 1 पथक, उरण येथे नागरी सुरक्षा दलाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.
किनारपट्टीलगतच्या 62 गावांना या वादळाचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, श्रीवर्धन, मुरूड या तालुक्यांमधील कोळी वाड्यांमधील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.