निसर्ग चक्रीवादळ रायगडमध्ये धडकले

0
134

 

निसर्ग’ चक्रीवादळ रायगडच्या अलिबाग जवळ श्रीवर्धन दिवेआगार किनारपट्टीवर धडकलं.चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ ६० किलोमीटर एवढा होता, वादळ किनाऱ्यावर धडकताना १०० किलोमीटर प्रतितास वाऱ्यांचा वेग होता. अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी  निशी चौधरी यांनी दिली. खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातील १५  हजार तर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार नागरिकांना  स्थलांतरीत करण्यात आले आहे.

चक्रीवादळ किनाऱ्यावर लँडफॉल झाल्यानंतर ते पेणच्या दिशेने सरकू लागले. वादळामुळे मुंबई गोवा महामार्गावर झाडे कोसळली यामुळे बराचकाळ महामार्ग वाहतुकीला बंद होता. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले आहे. जोरदार वारा आणि तुफानी पाउस यामुळे घरावरचे पत्रेही उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.  अनेक भागातील नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरु होते. जिल्ह्यातील म्हसळा, पेन, सुधागड, खालापूर, कर्जत, महाड या तालुक्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील  १५  हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग वादळाने दणादाण उडवली. वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. त्यात समुद्रात अजस्त्र लाटा उसळत आहेत. या लाटांच्या तडाख्यात मिऱ्या समुद्र किनाऱ्याजवळ नांगरून ठेवलेली नौका सापडली. वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात ही नौका भरकटली . या नौकेवर १३ खलाशी आहेत. या नौकेला किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान हे जहाज मिऱ्या येथील पांढरा समुद्राजवळच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुरक्षित पोहोचले आहे.  लाटांच्या तडाख्याने नांगर तुटल्याने हे जहाज भरकटले होते. ते सुखरुपपणे मिऱ्या बंदरात पोहोचले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी तसेच वित्त झाली नाही. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ५ हजार नागरिकांना  स्थलांतरीत करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वादळाचा फारसा प्रभाव जाणवला नसला तरी वादळामुळे गेले तीन दिवस जोरात पाउस पडत होता आणि वारेही वाहत होते. या वादळामुळे काही वर्षापूर्वी आलेल्या फयान वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या.  फयान वादळात बेपत्ता झालेले अनेक मच्छिमार आजही परत आलेले नाहीत. या वेळी मात्र प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत कोणीही मच्छिमार समुद्रात गेले नाहीत. जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ले, विजयदुर्ग बंदरात जिल्ह्यातील आणि राज्याबाहेरच्या मच्छिमार बोटी मोठ्या प्रमाणावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या काही भागात झाडे उन्मळून पडली मात्र यामुळे मोठे नुकसान झाल्याची नोंद उशिरापर्यंत नव्हती.

दरम्यान वादळ किनाऱ्यावरून पुढे सरकताच कोकणातील पाउस सायंकाळी उशिरा कमी झाला आहे. तरीही ४ जून पर्यंत खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here