सिंधुदुर्ग – नारायण राणे आणि काही विरोधक मंडळी मुख्यमंत्री पिंजर्यात बसल्याची टीका करताहेत.पण जर मुख्यमंत्री पिंजर्यात असतील तर पंतप्रधान मोदी कुठे बसलेत याचेही उत्तर विरोधकांनी द्यावं असा टोला राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज लगावला. तसंच जे आरोप मुख्यमंत्र्यांवर होतात तेच आरोप पंतप्रधानांनाही लागू पडतात हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचं काम संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय
उदय सामंत पुढे म्हणाले, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काम करतात ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनता बघतेय. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही. उलट काम करण्याला प्राधान्य देतोय. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधील परिस्थिती पहावी. तेथील अनेक भागात स्मशानात मृतदेह ठेवण्यासाठी जागा राहिलेली नाही. एकाचवेळी अनेक चिता पेटलेल्या दिसताहेत. त्याबाबतचे व्हीडीओ देखील व्हायरल होताहेत तेही पहायला हवेत.
भाजपाचे नेते जे आरोप करताहेत ते सर्व आरोप मोदींना लागू होतात
राजकारण आणि विरोध कधी करावा,हे भाजपला समजलं पाहिजे.देशाची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु आहे.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हाही लॉकडाऊन जाहीर करतील अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉम्परन्स करताहेत, तर मोदी काय करताहेत. पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या सभा, पण एकही रुग्ण मिळत नाही. भाजपाचे नेते जे आरोप करताहेत ते सर्व आरोप मोदींना लागू होत असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला.
सिंधुदुर्गात रेमेडिसिव्हीरचा तुटवडा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेमेडिसिव्हीरचा तुटवडा असल्याचे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी मान्य केले. तर लवकरच आवश्यक पुरवठा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्यातील रेमेडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात येणार्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट
सिंधुदुर्गात येणार्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा आरटीपीआर टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याची सीमा असलेल्या खारेपाटण चेकनाक्यावर आलेल्या प्रत्येकाची टेस्ट केली जातेय. याखेरीज शासकीय रूग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये रूग्णांना भेटण्यासाठी येणार्या नातेवाईकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तर दरम्यान सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात आल्यानंतर आरोग्य कर्मचार्यांनी थांबवले आणि माझी आरोग्य तपासणी केली. पालकमंत्री म्हणून वेगळा न्याय त्यांनी लावला नाही याचा मलाही अभिमान आहे असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.