शिवसेनेने मंत्रीपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये – आमदार भास्कर जाधव

0
127

 

सिंधुदुर्ग – नुकत्याच झालेल्या अधिवेशनामुळे शिवसेना प्रवक्ते तसेच आमदार भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, तिन्ही पक्षांना वाटतंय की भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करू शकतील. असे तिन्ही पक्षांचे मत आहे. तशा प्रकारची अनऑफिशियल चर्चा देखील झाली. पण मी ठामपणे सांगतो की, शिवसेनेने आपल्या कोट्यातील वनमंत्रीपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मताशी मी ठाम असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनेकडील वनखाते तसेच राहून सर्वांसंमतीने जर विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर शिवसेनेने घ्यावे, अन्यथा शिवसेनेने आपले मंत्रीपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये. कारण एकतर शिवसेनेला महत्वाची खाती नाहीत तसेच मंत्रीपदेही कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेने स्वतःचे मंत्रीपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.

भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले याबद्दल भास्कर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राणेंना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणे यांना यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सुद्धा उद्योग खाते दिले होते. त्यांनी उद्योगमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोकणात किती उद्योग धंदे आणले हे त्यांनी आधी तपासावे, पण त्यांनी काय उद्योगधंदे आणलेले दिसत नाहीत, पण आणले असतील समजा आणि त्यामध्ये काही उणीवा राहिल्या असतील, तर आपल्या मंत्रिपदाचा उपयोग देशाबरोबर आपल्या कोकणाला अधिकचा होईल असे त्यांनी काम करावे, अशा आपल्या अपेक्षा असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here