सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी निमित्त आज खरेदीसाठी सावंतवाडीत नागरिकांची एकच झुंबड उडाली. मंगलमुर्तीचे आगमन भाविकांना आनंद देणारे असल्याने विघ्नहर्ता हे संकट दूर करेल असा विश्वास भक्तांना आहे. त्यामुळे खरेदी करताना लोक गर्दीत मिसळून गेले होते.मात्र पाऊसाची रिपरिप लोकांना त्रासदायक ठरली.यंदा फुटपाथवर नागरिकांना बसविण्यात आल्याने वाहतूक कोंडीला मात्र काही अंशी लागाम घालण्यात आला. मात्र खरेदी करताना ग्राहकांमध्ये कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला सोशल डिस्टनगसिंगचा फज्जा झालेला पहावयास मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत भीती असल्याचे बोलले जात होते मात्र आजच्या गर्दीतून कोरोनापेक्षाही गणेश चतुर्थी सण महत्वाचा असल्याचे कोकणी माणसाने दाखवून दिले आहे.पाऊस कोसळत होता त्यामुळे गर्दीचे चित्र विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास हे होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेने गर्दी टाळण्यासाठी यंदाचा गणेशोत्सवाचा बाजार हा सोशल डिस्टनसिंग ठेवून श्री नारायण मंदिर ते आरपीडी कॉलेजपर्यंतच्या तलावाच्या काठावर भरविण्यात आला आहे.