कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका समितीची स्थापना केली होती. मात्र, समितीची पहिली बैठक होण्यापूर्वीच झालेल्या विद्यार्थी व संस्था चालकांचे सर्वेक्षणातील कलानुसार स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा मुद्दा रद्द झाल्यात जमा आहे.
कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना काही अभ्यासक्रमांसाठी 350 किमी प्रवास करून मुंबईमध्ये जावे लागते. तो त्रास कमी व्हावा यासाठी कोकणामध्येच रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सक्षम करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सद्यस्थितीला मुंबई विद्यापीठात 840 महाविद्यालये आणि 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वे करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक समिती गठित केली.
समितीमार्फत एक ऍप लाँच करण्यात आले, त्या ऍपच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांपासून विद्यार्थ्यापर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की 200 पैकी फक्त 20 विद्यार्थ्यांना आणि 100 पैकी फक्त 04 प्राचार्यांना नव्या कोकण विद्यापीठाची संकल्पना मान्य आहे. मुंबई विद्यापीठाऐवजी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याच्या कल्पनेला शिक्षण संस्थाचालक व विद्यार्थ्याचा विरोध असल्याने त्याबद्दलचा विचार राज्य सरकार थांबवणार असल्याचे स्पष्ट झाले.
स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीवर विचार करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष रमेश कीर, ऍड. विलास पाटणे, देवरुखचे सदानंद भागवत यांच्या सदस्यतेची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे होते. स्वतंत्र विद्यापीठाच्या विषयी मागणी व शक्यता यावर या समितीने विचार करणे अपेक्षित होते. परंतु या समितीची एकही बैठक झाली नाही. त्यापूर्वीच स्वतंत्र विद्यापीठाचा विचार रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वतंत्र विद्यापीठासाठी नेमलेल्या समितीची एकही बैठक झालेली नाही. सरकारने हा विचार बैठकीपूर्वीच रद्दबातल केला असला तरी या सरकारला अजूनही जाग येईल, अशी अपेक्षा आहे. त्यागराजन व टाकवले समित्यांनी अधिक विद्यापीठांची गरज सांगितली आहे. रोजगार, शहरीपणा, प्रवास व संशोधन यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज संपुष्टात येत नाही.