सिंधुदुर्ग – भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी दिनांक १५ व १६ मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरील व आसपासच्या सर्व गावांमधील नागरिकांनी दि. १४ ते १८ मे या कालावधीत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर किनारपट्टी आसपासच्या गावातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील विज पुरवठा खंडीत होण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तात्काळ आपल्या घरात आवश्यक इतके मेणबत्ती, आगकाडी बॉक्स, केरोसीन, टॉर्च इ साहित्य तयार करुन ठेवावेत. चक्रीवादळामुळे झाडे उन्मळुन व तुटुन पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तत्काळ तोडून घ्यावीत. सर्व नागरिकांनी आवश्यक रेशनची आपल्या कुटुंबासाठी व्यवस्था करुन ठेवावी. असेही सुचविण्यात आले आहे.
ग्राम कृती दल व ग्रामपंचायती यांनी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने चक्रीवादळ व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत दवंडी, रिक्षा फिरवुन, सोशल मिडीयाचा वापर करुन प्रचार प्रसिध्दी करावी. प्रत्येक गावस्तरावर जे.सी.बी, वुड कटर पोहणारे व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, स्वयंसेवक इ ची मोबाईल नंबरसह यादी तलाठी व ग्रामपंचायत यांचेकडे तयार करण्यात यावी व त्यांचे संपर्कात राहावे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पुरेशा पिण्याची पाण्याची सोय, पाणी शुध्दीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निर्जंतूकीकरण पावडर, उपलब्ध करुन घ्यावे. नागरीकांनी जादा पिण्याचे पाणी घरात सुरक्षीत जागी साठवुन ठेवावे. सदर चक्रीवादळाच्या कालवधीत कोणीही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी, पोहण्यासाठी समुद्रात जाणार नाहीत याची दक्षता ग्राम कृती दल व ग्रामपंचायतीने घ्यावी.
खिडक्या/दरवाजे काचा बंद कराव्यात किंवा वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झडपा घालावेत. बाहेरील दरवाज्याना मजबूत टेकू देण्यात यावा. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने जर स्थलांतराचे आदेश दिल्यास तात्काळ आदेशाचे पालन करावे व सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे. चक्रीवादळातील आपदग्रस्ताना तात्काळ मदत व उपचारासाठी प्राथमीक आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पीटललाआणण्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायत व ग्राम कृती दलानी ॲम्बुलन्सची व्यवस्था करुन ठेवावी. अशा सूचना करण्यात आल्या आहेत.