शिवसेनेला कोकणी जनतेने भरभरून दिले आहे. सेनेचे अनेक खासदार आमदार कोकणातील आहेत. मात्र, त्या बदल्यात कोकणी जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. कोकणातील १५ आमदार असूनही केवळ एक मंत्रीपद कोकणच्या वाट्याला आलं. सिंधुदुर्ग तर पोरका झाला. नागपूर अधिवेशनात आम्ही कोकणसाठी मागितलेल्या ५०० कोटींच्या विशेष पॅकेज बाबतही ठाकरे सरकारने चकार शब्द काढला नाही. कर्जमाफीतही कोकणातील प्रामाणिक शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या प्रश्नाला हरताळ फासण्याचे काम या सरकारने केलं. शिवसेनेकडून कोकणावर फार मोठा अन्याय झाला आहे, त्यामुळे कोकणी माणूस यापुढे सेनेला माफ करणार नाही, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार रमेश पाटील, राजन तेली, महेश सारंग, नगराध्यक्ष संजू परब, पुखराज पुरोहित, प्रसाद अारविंदेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप आदी उपस्थित होते.