सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या क्षेत्रातील जमिनीत मोठया प्रमाणात बेकायेशीररित्या वृक्ष तोड करण्यात आली आहे. वनविभागाकडून पाल,
पाट्ये गावातील हद्दीत झालेल्या या बेकायदा वृक्षतोडीची पाहणी व पंचनामा करण्यात आला आहे.
या परिसरातील सुमारे 1000 झाडे तोडण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिलारी धरण परिसरातील क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी शेती बागायती केली असून बहुतांश जमिनी मोठ्या प्रमाणात व्यवसायिकांनी खरेदी केल्या आहेत या क्षेत्रातील काही जमीनीत मोठया व्यवसायिकांनी दलालामार्फत बेकायदा वृक्ष तोड केली असल्याचा दावा स्थानिक शेतकरी करत आहेत. या वृक्ष तोड प्रकरणात काही बड्या व्यक्तींचा समावेश असल्याची चर्चा आहे. आता वनविभाग त्याच्या पर्यंत पोहचते की ,अज्ञाताकडून वृक्षतोड असे दाखवून प्रकरण फाईल बंद करते हे पाहाव लागणार आहे.
तिलारी धरण क्षेत्राच्या परिसरात सातत्याने वृक्ष तोडीचे प्रकार घडत असतात. आतापर्यंत फार कमी प्रकरणांवर कारवाई झाली आहे. आता पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई होईल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. तिलारी धरण क्षेत्रात राखीव जंगल आहे, मात्र या मोक्याच्या जमिनी खाली करता याव्यात आणि या ठिकाणी रबर सारख्या वनस्पतींचे उत्पादन घेता यावे म्हणून गुपचुप येथील जंगले तोडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.