तिलारी घाटात एसटी दरीत कोसळता कोसळता वाचली

0
134

 

कोल्हापूरहून पणजी येथे येत असलेल्या एस.टी. बसला तिलारी घाटात अवघड वळणावर अपघात झाला. यात सुदैवाने एस.टी.तील प्रवासी बचावले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या.

कोल्हापूर आगाराची सकाळी कोल्हापूरहून पणजीला जाणारी (एम. एच. 14 बी टी 3572) एस.टी. बस तिलारी घाटात आली असता एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीवर धडक बसून गाडी स्थिरावली, अन्यथा मोठा अपघात घडला असता. सुदैवाने एसटीतील काही किरकोळ प्रवासी सोडता बाकीचे प्रवासी सुखरुप आहेत. एसटी बसमध्ये एकूण 44 प्रवासी होते. तिलारी घाटात बस आली व अचानक बस एका वळणावर बाजूला गेली. संरक्षक भिंतीला मोठी धडक बसली. त्यावेळी आतील प्रवाशांवर मोठा आघात झाला आणि त्याचवेळी बस संरक्षक कठडय़ावर स्थिरावल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सायंकाळी उशिरापर्यंत अपघातग्रस्त एसटी हलविण्यात आली नव्हती.

संरक्षण भिंतीमुळे अपघात टळला

तिलारी घाटात एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका तीव्र वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूला जात रस्त्याकडेच्या संरक्षण भिंतीला धडक बसून एसटी बस स्थिरावली. अन्यथा एसटी बस बाजूच्या दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. संरक्षण भिंतीमुळे अपघात टळला.

एसटी चालकांच्या वेगावर नियंत्रण हवे!

कोल्हापूर आगाराच्या एसटी बसच्या चालकांची वेग मर्यादा अधिक असते. यातून दोडामार्गात बरेच अपघातही घडले आहेत. याबद्दल प्रवासी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहेत. अपघात घडल्यावर अपघाताचे कारण वेगावर नसलेले नियंत्रण ही बाब पुढे आलेली आहे. त्यामुळे या वेगावर नियंत्रण आणि अपघात टाळण्यासाठी एसटी चालकांना या बाबतच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here