एक ऐतिहासिक ठेवा वेंगुर्लेतील डच वखार शेवटची घटका मोजतेय

0
264

 

वेंगुर्ले प्राचीन काळी एक प्रसिध्द व्यापारी बंदर असल्याने, सोळाव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या डच व्यापार्‍यांचे साहजिकच वेंगुर्ले येथे आगमन झाले. वेंगुर्ले येथे हे प्रमुख व्यापारी बंदर असल्याने या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या विजापूरच्या आदिलशाहाच्या परवानगीने डच व्यापारी प्रमुख ‘लिटर्ड’ जान्सझून्स याने इ.स. १६५५ साली ही वखार बांधली होती.

परंतू ती कोसळली म्हणून नवीन मजबूत किल्ला पध्दतीची तटबंदीयुक्त वखार बांधण्यात आली. त्यासाठी त्याकाळी तीन हजार गिल्डर (तीन हजार तोळे) एवढा खर्च आला. या वखारीचे बांधकाम किल्ला पध्दतीचे, तटबंदीयुक्त मुद्दाम बांधण्यात आले.  माल साठविण्याचे गोदाम तसेच गढी म्हणूनही याचा उपयोग व्हावा अशी तिची मजबूत बांधणी करण्यात आली होती.

त्याठिकाणी दहा तोफा व दोनशे बंदुकीचा पहारा ठेवण्यात आला होता. वखारीवरील तोफांवर आफ्रिकेतील गुलामांची नेमणूक करण्यात आली होती. तर संरक्षणासाठी भारतीय सरंक्षक गार्ड होते. डच वखारीची इमारत पोर्तुगीज पध्दतीची आहे. पोर्तुगिज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी युरोपातील विविध देशातील व्यापारी भारतात बनणारा माल (मसाले, सुती कपडे,सोन्या चांदीच्या वस्तू इ.) युरोपात विकून भरपूर नफा कमवत असत. तर युरोपात तयार होणारा माल (बंदुका, तोफा, दारू, काच सामान, लोकरीचे कपडे, दुरदर्शिका,चष्मे इ.) भारतात आणून विकत असत. या सागरी मार्गाने होणार्‍या व्यापारातील माल साठवण्यासाठी या परदेशी व्यापार्‍यांनी ठिकठिकाणी बंदरांजवळ आपल्या वखारी (वेअर हाऊस/ गोडाऊन) स्थापन केल्या.

व्यापारा बरोबरच राज्य विस्तार हा सुप्त हेतू मनात असल्यामुळे अनेक ठिकाणी या वखारींची उभारणी किल्ल्यांप्रमाणे करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या सागर किनार्‍यावर पोर्तुगिज, इंग्रज, डच यांच्या वखारी होत्या. त्यापैकी डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात आहे. वेंगुर्ले शहरात आजही या वखारीचे अवशेष पहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्यात डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात आहे. त्याची डागडूजी करून त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिल्यास ते एक चांगले पर्यटन केंद्र होऊ शकेल. या वखारीतून आयात -निर्यात होणार्‍या वस्तू, त्याकाळचे डचांचे पोषाख, पुतळे, तोफा यांच्या प्रतिकृती यात ठेऊन पर्यटकांना आकर्षित करता येईल.

डच वकिलातीने १९८३ मध्ये या डच वखारीच्या संरक्षणाची मागणी केली व तिकडे होणा-या दुर्लक्षाकडे पंतप्रधान इंदिरा गांधीचं लक्ष वेधलं, तेव्हा खास बाब म्हणून दहा हजार रुपये खर्चून डागडुजी केल्याचं फक्त नाटक केलं गेलं. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करावयाचं आणि गोष्ट निकाराला आली की काही करता येत नाही म्हणून हळहळायचं हे धोरण योग्य नाही. इथे महाराष्ट्र देशी सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब आदी सत्तांनी महाराष्ट्रात फार प्राचीन काळापासून दुर्गबांधणी केली. मोगल , बहामनी , अँबिसिनियन सिद्दी , इंग्रज , पोर्तुगीज , मराठे यांनीही काही दुर्गरचना केली. पण डचांनी बांधलेला हा एकमेव किल्ला आपण जपला पाहिजे, नाहीतर हा वास्तुविशेष नष्ट झाला की हळहळत बसावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here