सिंधदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरज नसताना 2 ते 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी शेती अवजारे, खते आदी शेतीकामांसाठी शहराच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. जनतेमध्ये तसेच व्यापारी संघामध्येही लॉकडाऊनमुळे प्रचंड नाराजी आहे. जेथे आवश्यक आहे तेथेच लॉकडाऊन करा. उर्वरीत भागात लॉकडाऊन रद्द करून जिल्हावासीयांना दिलासा द्या अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.
तेली यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आणि हि मागणी केली आहे. गेले साडेतीन महिने सिंधुदुर्गातील जनतेने जिल्हा प्रशासनाला पूर्णतः सहकार्य केले. लॉकडाऊनचे सर्व नियम कसोशीने पाळले. आता कुठे चालू झालेल्या पावसामुळे जनजीवन सुरळीत होण्यास सुरवात झाली होती. मात्र गरज नसताना जिल्ह्यात पुन्हा 2 ते 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे लोक हैराण आहेत असे तेली यावेळी म्हणाले.
जिल्हयात कणकवली व कुडाळ तालुक्यातील पिंगुळी सोडले तर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, देवगड आणि वैभववाडी तालुक्यात कोठेही कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन योग्य नाही. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करून, जेथे आवश्यक आहे तेथेच लॉकडाऊन करावे. उर्वरीत ठिकाणचे लॉकडाऊन रद्द करावे अशी मागणी तेली यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.