सिंधुदुर्ग – राणे कंपनीने “धुडगुस” घातला की आमचा विजय निश्चित असतो. आता जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सुध्दा वेंगुर्ला निवडणूकीची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान नितेश राणेंवर होत असलेली कारवाई ही पोलिसांकडुन आहे. मात्र आता ओरड करण्यापेक्षा त्यांना वेळीच वडील म्हणून राणेंनी आवरले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. श्री. केसरकर याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी श्री.केसरकर पुढे म्हणाले, नितेश राणेंवर होत असलेली कारवाई ही सुडापोटी असल्याची टिका राणेंनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात संतोष परब यांच्यावर जो चाकूने हल्ला करण्यात आला त्या गुन्ह्यात श्री.राणे यांचे नाव आहे. त्यामुळे ही कारवाई होत आहे. मात्र त्यांचा आरोप चुकीचा आहे. यापुर्वी नितेश राणे यांनी अनेक वेळा टोकाला जावून आरोप तसेच टिका केली होती. तसेच त्यानंतर त्यांनी माफी सुध्दा मागितली होती. त्यामुळे अशा प्रकाराला पाठीशी घालण्यापेक्षा एक वडील म्हणून वेळीच राणेंनी आपल्या पुत्रांना आवरणे गरजेेचे होते. तसे झाले असते तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले.