महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ४४ पैकी ३५ आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हायकमांडला देण्यात आले आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेचे समर्थन करण्याची भूमिका मांडली. सामाजिक-आर्थिक मुद्यांचा विचार करता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे एका काँग्रेस आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका, अयोध्या निकाल या सर्वाचा काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल या दृष्टीनेही बैठकीत विचार करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे राज्यातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपाने काल संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन आवश्यक संख्याबळ नसल्याने सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले. आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात असून सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.