रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग वर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टीलने भरलेला ट्रक, आयशर टेम्पो, आंबा वाहतूक करणारी बोलेरो आणि एक कार अशी चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातात ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, या महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.



