सिंधुदुर्ग – जिल्हय़ातील सध्याची परिस्थिती कोरोनामुळे भयावह झालेली आहे. रुग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जि. प. माजी उपाध्यक्ष मधुसूदन बांदिवडेकर यांच्यासारख्या राजकीय पदाधिकाऱयाचा मृत्यू झाला. अपुऱया आरोग्य सुविधांमुळे कुडाळचे व्यापारी कै. भोगटे, मालवणमधील दोन बहिणी आणि विविध गावांतून सुमारे 55 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. हे सर्व रुग्ण केवळ सिंधुदुर्गातील अपुऱया आरोग्य सुविधा, दवाखान्यांतून होणारी रुग्णांची हेळसांड आणि अत्यावश्यक व गंभीर आजारी माणसांना उपचार करण्यासाठी नसलेली आवश्यक यंत्रणा हिच कारणे आहेत. या साऱयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.
मनसेने गेले अनेक महिने जिल्हय़ातील आरोग्य विभागांतील अपुरे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी वर्ग, अपुऱया सोयी, रुग्णांचे होणारे हाल आणि इतर साहित्य सेवा याबाबत आवाज उठविला. आरोग्य यंत्रणेशी पत्रव्यवहार, आंदोलने यासारखी आयुधे वापरून जनतेला चांगले उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न केले. मात्र, जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी आणि आमदार, खासदार तसेच पालकमंत्र्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. केवळ बैठका घेणे, अधिकाऱयांशी चर्चा करणे आणि वृत्तपत्रांतून घोषणा करण्यापलिकडे जनतेला अपेक्षित कामे होऊ शकत नाहीत. म्हणून जनतेनेच आता स्वतः रोज तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, गरम पाणी पिणे, हळद घालून दूध पिणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, गरम वाफ घेणे, घरगुती काढा घेणे आणि लोकसंपर्क कमी करणे, रहदारीच्या ठिकाणी गर्दी न करणे, स्वतःबरोबर कुटुंबियांची काळजी घेणे, सार्वजनिक बैठका, सभा, जेवणाचे कार्यक्रम यामध्ये सहभाग न घेणे, लक्षणे दिसू लागल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे, अशा प्रकारची काळजी स्वतः घेऊन कोरोनाला रोखण्याची गरज आहे. ज्या-ज्या ठिकाणी जनता कर्फ्यू लागू केला असेल, अशा ठिकाणी राहणाऱया सर्व लोकांनी कोणतेही राजकारण विसरून जनता कर्फ्यूला साथ द्यावी, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे. जिल्हय़ातील बहुसंख्य शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील जिल्हय़ाबाहेरील अधिकारी व कर्मचारी हे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे व अन्य भागांतील असल्याने व शासनाने त्यांना दर शनिवार व रविवारी सुट्टी दिलेली असल्याने ते दर गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यालय सोडून आपल्या मूळ गावी जातात व दर सोमवारी किंवा मंगळवारी जिल्हय़ात कामावर येतात. शिवाय बैठका घेतात. त्यामुळे इतर कर्मचारी व कामासाठी कार्यालयांतून येणारे लोक त्यांच्या संपर्कात येत आहेत. परिणामी शासकीय कार्यालयांतून सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. जिल्हा कृषी विभागाचा एक शिपाई त्यामुळेच कोरोना होऊन मृत्यूमुखी पडलेला आहे. म्हणूनच शासकीय कामकाजाच्या अति महत्वाच्या बैठका सोडून कुणी जिल्हय़ाबाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही उपरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .