राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा,  मुंबईत शेतकरी धडकले राजभवनवर

0
101

महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. परतीच्या पावसामुळं यंदा राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत पिके अक्षरश: वाहून गेली आहेत. मात्र, सत्ता स्थापनेच्या घोळामुळं प्रशासनाचं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष झाल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी आज राजभवनावर धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं. एरवी गनिमी काव्यानं व अचानक आंदोलन करणाऱ्या कडू यांनी यावेळी जाहीर आंदोलन केलं. त्यामुळं पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे हा मोर्चा राजभवनवर जाण्याआधीच अडवला गेला. त्यामुळं शेतकरी अधिकच आक्रमक झाले. सरकार नंतर स्थापन करा आणि आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. तरुणांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here