नोकरी नसल्याने युवकाने उचलले टोकाचे पाऊल; अख्खा गाव हादरला

0
377

 

सिंधुदुर्ग : नोकरी नसल्याच्या नैराश्यातून युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे कापईवाडीत मंगळवारी सायंकाळी घडली. साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकाचे नाव आहे. एकुलत्या एक असलेल्या साहिलने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या आई- वडिलांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

साहिलचे वडील गावात मोलमजूरी करतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते कामाला गेले होते. तर आई सावंतवाडीत मंगळवारच्या बाजाराला गेली होती. त्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधून साहिलने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. साहिलची आई सावंतवाडीतून सायंकाळी सहाच्या सुमारास आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच साहिल गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. साहिल मृत अवस्थेत पाहून तिने हंबरडा फोडला. तिच्या आक्रोशामुळे शेजारी धावून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

साहिल हा बारावी उत्तीर्ण होता. पुढील शिक्षण घेण्याच्या जिद्दीसह तो नोकरीच्या प्रतीक्षेत होता. साहिल हा एकुलता एक मुलगा असल्याने केळुसकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. साहिलच्या या दुर्दैवी निधनाचा सर्वांच्याच मनाला चटका लागला. साहिलच्या या आकस्मित निधनामुळे ओटवणे गावावर शोककळा पसरली. या घटनेनंतर ओटवणेवासियांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान या घटनेची माहिती ओटवणे पोलीस पाटील लक्ष्मण गावकर यांनी सावंतवाडी पोलीस स्थानकात देताच पोलीस अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या घटनेची सखोल माहिती घेऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह मंगळवारी रात्री शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, साहिल याने गळफास लावण्यापूर्वी चिट्टी देऊन ठेवली होती. त्यात आपल्याला नोकरी नसल्यामुळे आपण या नैराश्येतून आत्महत्या करीत म्हटले स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here