सिंधुदुर्ग – जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळावर नागरिकांना येण्यास बंदी घातल्याने रविवारी अनेक पर्यटकांना पोलिसांनी माघारी पाठवले. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. ऐन पर्यटन हंगामात पर्यटनाला बंदी असल्याने व्यावसायिकांचे मात्र नुकसान होत आहे.
पावसाळा आला की वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात पर्यटकांची एकच गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या आंबोलीतील धबधब्याजवळ पर्यटकांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पर्यटनस्थळावर रविवार असल्याने पर्यटक येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला असल्याने सावंतवाडी पोलिसांकडून आंबोली येथील विविध भागातील पर्यटनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरवर्षी आंबोलीमध्ये गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सांगली यांसह सिंधुदुर्गातील मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. गेले दोन दिवस आंबोलीतील पर्यटनस्थळावर वर्षा पर्यटन निमित्त गर्दी होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने आदेश जाहीर करत जिल्ह्यातील सर्वात पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घातली. असे असतानाही रविवारी आंबोली येथे बरेच पर्यटक दाखल झाले होते. सकाळच्या सुमारास काही पर्यटकांच्या गाड्याही आंबोली घाट परिसरात दिसून येत होत्या. यावेळी तेथे पेट्रोलिंग साठी असलेल्या पोलिसांनी तातडीने त्यांना सूचना देत माघारी पाठवले. यावेळी पर्यटकांवर कारवाई करण्यात आली नाही; मात्र यापुढे आंबोली घाटात दाखल होणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली.