सत्ताधाऱ्यांची खेळी यशस्वी, विधानसभा अध्यक्षांची झाली बिनविरोध निवड

0
113

 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेचा संबंध जोडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी यशस्वी झाली. भाजपच्या माघारीनंतर अध्यक्षपदी नाना पटोले यांची रविवारी बिनविरोध निवड झाली.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केले होते. राज्यात १९९९चा अपवाद वगळता विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही सहमतीनेच करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदासाठी विधिमंडळाच्या नियमात गुप्त मतदान पद्धतीची तरतूद आहे. गुप्त मतदान टाळण्यावरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीचा प्रयत्न होता. यातूनच अध्यक्षपदासाठी खुल्या पद्धतीने मतदान घेऊन नियमाला बगल देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली होती. पण यातून टीका होण्याची भीती होती.

दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या कामकाजात विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेचा समावेश करण्यात आला होता. रविवारची कामकाज पत्रिका शनिवारी रात्री तयार करण्यात आली. यात अध्यक्षांची निवडणूक आणि बाकी कामकाज दाखविण्यात आले होते.

विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेचा उल्लेखच नव्हता. भाजप नेत्यांच्या ही बाब निदर्शनास आली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांशी संपर्क साधला. कारण देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी रविवारी निवड झाली नसती तर ती नागपूर अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडली असती. भाजपला ते टाळायचे होते. त्यानुसार अखेर वाटाघाटी होऊन अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली आणि विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा करण्यात आली.

विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध केल्यास विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा रविवारी केली जाईल, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले. छगन भुजबळ, जयंत पाटील या मंत्र्यांनी विरोधकांशी वाटाघाटी केल्या. अखेर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड करण्यास होकार दिला. यासाठी विरोधी पक्षनेतेपदाची रविवारीच घोषणा करण्याची अट घातली. ही अट सत्ताधाऱ्यांनी मान्य केली आणि देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा झाली.

पटोलेंचे कौतुक : विधानसभेचे १५वे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. भंडारा जिल्ह्य़ातील साकोली मतदारसंघातून चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले पटोले हे २०१४ मध्ये भाजपच्या वतीने लोकसभेवर निवडून गेले होते. भाजप नेतृत्वाशी वाद झाल्यावर त्यांनी खासदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला होता. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी पटोले यांच्या नावाची घोषणा करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील आदी पटोले यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेले. यानंतर मुख्यमंत्र्यांसह गटनेत्यांनी पटोले यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

‘सर्वाना न्याय देणार’ : प्रसंगी अन्यायाविरोधात लढून बंड करण्याच्या पटोले यांच्या गुणाची मला आधी कल्पना नव्हती, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. कारण मोदी यांच्याशी मतभेद झाल्यावर पटोले यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. पटोले हे अध्यक्ष झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल पटोले यांनी सर्व सभागृहाचे आभार मानले आणि निष्पक्षपणे काम करून सर्वाना न्याय देण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here