सिंधुदुर्ग – चाकरमान्यांना गावी आणण्यावरून राजकीय पक्षांकडून चढाओढा लागली असताना, जिल्ह्यातील सरपंच संघटनेने मात्र याला विरोध केला आहे.
या सदर्भात संघटनेने पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विरोध दर्शवला आहे. झोन निहाय रुग्णांची विभागणी करून त्यांना कॉरंटाईन करा अशी मागणी संघटनेने केली आहे.
शासन चाकरमान्यांना गावातील शाळा व मंदीरात ठेवण्याच्या हालचाली करत असताना सरपंच संघटनेने याला विरोध केला आहे. गावातील शाळा व मंदीरात राहण्यासाठी सुविधा नाहीत. पाणी, शौचालय, बाथरूमची योग्य सुविधा नाही मग कोणतीही सुविधा नसताना हा घाट कशासाठी घातला जातोय असा सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
त्याशिवाय रेडझोन मधुन आलेल्या चाकरमान्यांना तालुकास्तरावरील मोठ्या काॅलेज , संस्थामधे कॉरंटाईन करून योग्य ती तपासनी करूनच त्यांना गावात प्रवेश द्यावा अशी मागणीही सरपंचं संघटनेने केली आहे. या सदर्भात शासनाने योग्य ती पावले उचलावीत. गावातील सरपंचाना नाहक वेठीस धरल्यास सामुहिक राजीनामे देण्याचा इशाराही दोडामार्ग मधील सरपंचानी दिला आहे. दरम्यान सरपंच संघटनेच्या या भूमिकेमुळे सिंधुदुर्गतील वातावरण चाकरमानी विरुद्ध गाववाले असे होणार आहे.