मालवण पंचायत समिती कडून किल्ले सिंधुदुर्ग ची स्वच्छता माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग

0
163

सिंधुदुर्ग – किल्ल्यावर आज मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग किल्ला हे अभियान राबविण्यात आले. माजी खासदार निलेश राणे यांची देखील उपस्थिती लाभली होती. पंचायत समितीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी या किल्ल्याची आज दिवसभरात स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेबाबत पर्यटकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

पर्यटकांनी आणि स्थानिकांनी किल्ल्याचे विद्रुपीकरण थांबवावे

मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्‍य पाताडे यावेळी म्हणाले, मालवण किल्ला हा छत्रपतींची ओळख असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या पर्यटकांनी या ठिकाणी प्लास्टिक बॉटल अथवा कचरा टाकून या किल्ल्याचे विद्रुपीकरण करू नये. स्थानिकांनी देखील या किल्ल्याचे विद्रुपीकरण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मालवण तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले आणि पर्यटन स्थळे साप करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विविध ठिकाने साफ करून या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही सभापती पाताडे यांनी सांगितले.

स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणार

मालवण चे उपसभापती राजू परुळेकर म्हणाले या ठिकाणची ऐतिहासिक स्थळे जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जे काही करणे शक्य आहे ते आम्ही करू. असे सांगतानाच यापूर्वी आणि तालुक्यातील भरतगड किल्ला रामगड किल्ला कुडोपी मधली कातळशिल्पे साफ करण्याचे काम केले आहे. आत्ता आम्ही मालवण किल्ल्याची साफसफाई करत असताना साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला सुस्थितीत आणि सुरक्षित राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

स्वच्छतेची मोहीम एका दिवसापुरती नको

हा किल्ला पाहायला आलेले पर्यटक अमित खोत म्हणाले मालवण पंचायत समितीने प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्गकिल्ला हा अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. ही मोहीम आजच्या एका दिवसापुरती मर्यादित न राहता हा किल्ला कायमस्वरूपी प्लास्टिक मुक्त आणि कचरा मुक्त होण्यासाठी योजना राबवली गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेला हा किल्ला असाच राहण्यासाठी त्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी प्रत्येकाने किल्ल्याच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली पाहिजे. असेही अमित खोत यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here