महाराष्ट्रात भाजप सरकार कोसळल्यानंतरच पर्यायी सरकारबाबत विचार : राष्ट्रवादी

0
125

महाराष्ट्रात भाजपने सत्तास्थापन केल्यास त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल व मतदानावेळी आम्ही भाजप सरकारविरोधात मतदान करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तर सरकार कोसळल्यानंतरच पर्यायावर विचार करू असाही ते म्हणाले. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही तर हे सरकार कोसळेल. तेव्हा उद्भवणाऱ्या स्थितीत महाराष्ट्राच्या हितासाठी पर्यायी सरकार कशाप्रकारे देता येईल, यावर आम्ही निश्चितच विचार करू, असे मलिक यांनी नमूद केले. मलिक यांनी शिवसेनेबाबतही महत्त्वपूर्ण असे विधान केले. भाजप सरकार पाडण्यासाठी शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार आहे का, हे आम्हाला पाहायचे आहे. असे ते म्हणाले.

२८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत १४५ हा बहुमताचा जादुई आकडा असून भाजपकडे १०५ आमदारांचे बळ आहे. निकालांनंतर काही अपक्ष आमदार व छोट्या पक्षांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना धरूनही भाजपचं संख्याबळ जेमतेम १२०च्या आसपास जात आहे. अशा स्थितीत बहुमताचा आकडा फारच दूर राहणार आहे. त्यामुळे सत्तेचं गणित अधिकच रंगतदार होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत.

असं आहे पक्षीय बलाबल

भाजप- १०५
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४
बहुजन विकास आघाडी- ३
एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २
प्रहार जनशक्ती पार्टी- २
माकप- १
जनसुराज्य शक्ती- १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
शेकाप – १
अपक्ष- १३
एकूण जागा- २८८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here