सिंधुदुर्ग – निसर्ग चक्रीवादळात कोकणात फार मोठे नुकसान झाले आहे. सरकारने केलेली मदत ही मात्र त्यामानाने पुरेशी नाही. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जशी दसपट मदत दिली गेली तशी मदत चक्रीवादळग्रस्थ शेतकऱ्याला सरकारने द्यावी अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
संपूर्ण कोकणचा दौरा केल्यानंतर आमदार लाड कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळो ते म्हणाले, कोकणात आंबा, काजी,नारळ,सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. सरकारने रायगडला 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी जाहीर केले आहेत. ते येथील बागांच्या साफसफाईलाही पुरणार नाहीत. कोकणातला शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे तर त्याला दसपट मदत केली पाहिजे असे आमदार लाड म्हणाले. अजूनही वादळग्रस्त भागात लाईट नाही, बँका बंद आहेत, नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. मुख्यमंत्री कोरोनाच्या भीतीने रायगडच्याही पुढे आले नाहीत. सरकारमधील सर्व पक्षाचे मंत्री वेगवेगळा आढावा घेत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.