पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता; आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

0
121

यावर्षी कोकणात उशिरा सुरू झालेल्या पावसाने नंतर मात्र, चांगलाच धुमाकूळ घातला. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पावसाने हजेरी लावली. या लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, हापूस आंब्याला पोषक असे वातावरण अद्यापही कोकणातील जिल्ह्यात निर्माण झालेले नाही. आंबा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार असून डिसेंबर महिन्यात झाडांना मोहोर येईल. फेब्रुवारी, मार्च महिन्यात आंबा बागायतदारांना याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणपणे कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते. याचवेळी मतलई वारे वाहण्यास सुरुवात होते. जमिनीचा वाफसा, मतलई वारे आणि थोडी थंडी ही कलमांना मोहोर येण्यास अनुकूल परिस्थिती असते. मात्र, यावर्षी मोहोर येण्यास वातावरण अजूनही प्रतिकूल झालेले नाही. उशिरा फ्लॉवरिंग झाले की हार्वेस्टींगलाही विलंब होतो. यावर्षी नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी नाही, त्यामुळे आलेली पालवी जूनी होऊन त्याला मोहोर येण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्येच होईल. त्यानंतर पुढे आंबा तयार होण्यासाठी किमान 110 ते 120 दिवस लागतात. याप्रमाणे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा तयार होईल. या परिस्थितीचा आंब्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल, अशी माहिती आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here