सिंधुदुर्ग – गेले तीन दिवस आंबोली मध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे आंबोलीतील वर्षा पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेला घाटातील धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या धबधब्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच येथील व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत.
हा पाऊस आणखी चार दिवस असाच सुरू राहिला तर पूर्णक्षमतेने हा धबधबा प्रवाहित होईल असे येथील पर्यटन व्यावसायिक काका भिसे यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन बंद असून आंबोलीचा मुख्य पर्यटन हंगाम समजल्या जाणाऱ्या वर्षा पर्यटन हंगामासाठी कितपत पर्यटक येतील याबाबत येथील पर्यटन व्यवसाय चिंतातुर आहेत. जर यंदाच्या वर्षी वर्षा पर्यटन झाले नाही तर येथील पर्यटन व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय चालण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेला व्यावसायिक जगण्यासाठी निदान जिल्हा अंतर्गत व ग्रीन झोन मधील जिल्ह्यातील पर्यटकांना पर्यटनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी काका भिसे यांची आहे.
येथील वर्षा पर्यटन गेल्यावर्षीही अति पर्जन्यवृष्टीमुळे अडचणीत आले होते. त्यानंतर दिवाळी व क्रिसमस पर्यटन हंगामामध्ये काही दिवस येथील पर्यटन व्यवसायिकांनी व्यवसाय केला. त्यानंतर लगेचच कोरोनामुळे येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला त्या दरम्याने मे महिना हा सुद्धा येथील मुख्य पर्यटन हंगाम असतो तोही होऊ शकला नाही आणि आता वर्षा पर्यटन तोंडावर असून हा हंगाम कोरोनाच्या संकटात सापडेल अशी भीती येथिल व्यावसायिकांना वाटते.