सिंधुदुर्ग – कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास येथील लोकांना तातडीची मदत आणि सुरक्षा देण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी व रायगड येथील समुद्रकिनाऱ्यावर १८ कोटी रूपये खर्च करून शेल्टर हाऊस उभारण्यात येणार आहेत,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर भाजप नेत्यांनी कोकणात दौरा करून आत्मनिर्भर अभियानाच्या नावाखाली जनतेच्या मनात खोटं बिंबवण्याचं काम केलं. असे पालकमंत्री उदय सामंत व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
आज या दोन्ही पालकमंत्र्यांनी झूम अँप द्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. निसर्ग वादळ आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कोकणातील नुकसानग्रस्थ शेतकरी, बागायतदाराला जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी NDRF च्या नियमात बदल केले. कोकणात तातडीने मदत पोचवली. आतापर्यंत पंच्याहत्तर टक्केहून अधिक रक्कम वाटली गेली आहे. याबाबत विरोधक बोलत नाहीत ते केवळ जनतेच्या मनात विष कालवण्याचं काम करत आहेत. असेही विधान या दोन्ही पालकमंत्र्यांनी केले. कोकणातील सातबारामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यामुळे मदतीचे वाटप करण्यात अडचण येत आहे. मात्र कोरोनाचा काळ लक्षात घेता अन्य लोकांनी आपल्या येथील स्थायिक नातेवाईकाला हमीपत्र दिल्यास मदतीची हि रक्कम तात्काळ जमा करता येईल. हा पर्याय देखील आपण दोघांनी मुख्यमंत्रि ठाकरे यांच्याशी बोलून घेतला असल्यासाचे त्यांनी सांगितले.
आपण दोघेही शिवसेना म्हणून एकसंघ असे काम करत असताना आमच्यात एकमेकाबद्दल चीड निर्माण करायचे काम काहीजण करत आहेत. मात्र विरोधकांनी आम्हाला चिडवण्यासाठी कितीही तिळपापड केला,तरी आम्ही त्यांना पुरून उरू,प्रसंगी रस्त्यावर उतरू,आम्ही पाचवी-सहावीतले नाही,तर आमच्या दोन-तीन टर्म झाल्या आहेत,असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. तर येत्या दोन दिवसात कोकणातील नुकसानग्रस्थ लाभार्थ्यांसाठीची उर्वरित रक्कम त्या त्या जिल्हा प्रशासनांकडे वर्ग होईल असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले.