सिंधुदुर्ग – कोकणात गेले आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसात चांगलीच सुरवात केली आहे. पावसाविना थांबलेल्या शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. तर काही भागात नद्या नाले भरून वाहताना पहायला मिळाले.
रायगड जिल्ह्यात आज एकूण 975.50 मिमी पाऊस पडला असून सरासरी 60.98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तळा तालुक्यात सर्वाधिक 141. मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 84.12 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 106.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून 145.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकणात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. या काळात समुद्रात 4 ते 5 मीटरच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकिनारी आणि समुद्रकिनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान कोकणात पावसाळी भात शेतीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. सुरवातीला आलेला मान्सून अचानक गेला आणि येथील शेतीची कामे खोळंबली. भात लागवडीसाठी आवश्यक असलेली भाताची रोपे अर्थात तरवा तयार झाला आहे. योग्य वेळी त्याची लागवड झाली नाही तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊ शकते. तरी आता पावसाने जोर धरला असल्याने भात शेतीच्या कामानीही वेग घेतला आहे.