राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रिपदावरील सत्तापेच आज सुटणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. तर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधींनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
कधीही सत्तेच्या खुर्चीत बसणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. त्यामुळे ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने आजवर लाभाचे पद भूषविलेले नाही. उद्धव यांनी आजवर कधीही निवडणूक लढविली नाही. मात्र ते थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेच्या भवितव्याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या. पण, उद्धव यांनी पक्षाची धुरा समर्थपणे पेलली. आज ते शिवसेनेला सत्तेच्या तख्तापर्यंत घेऊन गेले आहेत.
मागील शुक्रवारी जेव्हा शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे नेते नेहरू सेंटर येथे पहिल्यांदा भेटले. तेव्हा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरे महाविकासआघाडी सरकारचे नेतृत्त्व करत नाहीत, तोपर्यंत नव्याने स्थापन होणार सरकार स्थिर राहणार नाही, असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे मत होते. शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याबाबत संभ्रमात होते. अखेरीस शरद पवारांनीही आग्रह केल्यानंतर ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यास राजी झाले.