रेव्होलुशनरी गोवन्स आणि ग्रीन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी आकार म्हार्दोळ इथल्या डोंगराळ भागातील पावसाळी हंगामात लागवड करणाऱ्या मळ्यामध्ये काम करण्याचा अनुभव घेण्यासाठी एक दिवस मळ्यान हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रेव्होलुशनरी गोवन्स चे सहसंस्थापक विश्वेश नाईक, शैलेश नाईक, प्रेमानंद गावडे व इतर आर.जी.सदस्य हजर होते.
आकार म्हार्दोळ येथील शेतकरी तुळशीदास गावडे यांच्या शेती मळ्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यादरम्यान सर्वांनी आप आपल्या परीने काम करून गावडे यांना मळ्यामध्ये आधार केला.
यावेळी विश्वेश नाईक यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीवर प्रकशजोत टाकला आहे, राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की आजपर्यंत कोणत्याच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही. राजकारण्यांनी फक्त कष्टकरी कष्टकरी म्हणून त्यांचा स्वताच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे. पुढे बोलताना विश्वेश नाईक म्हणाले की तरुण पिढीने आता हे शेतीचे वैभव पुढे नेण्याचे काम केले पाहिजे आणि आपली शेती, आपल्या जमिनी राखून ठेवल्या पाहिजे असेही नाईक म्हणाले.
शिरोडा येथील शैलेश नाईक यांनी फोंडा तालुक्यातील चारही आमदारावर अकार्यक्षम असल्याची टीका केली आहे. आजपर्यंत त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीच आधार केला नसल्याचे ते म्हणाले. गौरेश गावडे यांनी सुद्धा स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, कसेल त्याची जमीन बाबत स्थानिक आमदाराने गंभीरतेने लक्ष दिले नाही. शेतकऱ्यांचे, बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी फक्त एकदाच विधानसभेत पाठवा असे गोविंद गावडे यांनी आश्वासन दिले होते, परंतु आमदारकीची ही दुसरी वेळ असून आजपर्यंत त्यांनी सामान्य शेतकऱ्यांचे, सामान्य जनतेचे विषय कधी विधानसभेत मांडलेच नाही. आज लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेत नसल्यामुळेच आज शेतकरी हतबल झाला असल्याचेही गौरेश गावडे म्हणाले.