सिंधुदुर्गात मासळी उद्योगासमोर अनेक समस्या मच्छिमारांना हवीय अत्याधुनिक बंदर जेठी

0
167

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला हा तीन तालुके समुद्र किनारी वसलेले आहेत. या ठिकाणी मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या तिन्ही तालुक्यात मच्छिमारांच्या बोटी अत्यंत सुरक्षितपणे लागतील अशी एकही बंदर जेठी नाही किंवा मासळी साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज नाही. मच्छिमारांच्या समुद्रातील समस्याही अत्यंत वाईट अनुभव देणाऱ्या आहेत.

मालवण हे मासेमारीचे जिल्ह्यातील मुख्य केंद्र आहे. या ठिकाणच्या मच्छिमारांशी आणि त्यांच्या संघटनांच्या नेत्यांशी आम्ही संवाद साधला असता येथील भीषणता समोर आली आहे. इथल्या समुद्रात अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या भांडवलदारी उद्योजकांच्या आक्रमणाला येथील मच्छिमार तोंड देत आहे. शिवाय स्थानिक पातळीवरच्या समस्या त्याला सतावत आहेत. घटत्या मत्स्य उत्पादनामुलेही येथील मच्छिमार अडचणीत आला असल्याचे समोर येत आहे. सध्या येथील समुद्रात ६० ते ६५ टक्के मासळी उत्पादन घातले आहे. या भागात ३५ हजार सक्रिय मच्छिमार आहेत. काही वर्षांपूर्वी केवळ मालवणमध्ये ३५० ट्रॉलर होते आता केवळ ६० ते ६५ शिल्लक असल्याचे येथील जाणकार सांगतात

छोटू सावजी हे मालवणमधील श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष आहेत. ते मच्छिमारही आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, याठिकाणी जेठीची सुविधा नाहीय. किंवा कोल्ड स्टोरेज आपल्याकडे नाहीत. बाहेर फिशिंग करत असताना हायस्पीड टॉलर, एलईडी बोट, पर्ससीन नेट आणखी काही तामिळनाडू, पॉंडेचरी, गोवा, गुजराथ या राज्यातून जे मच्छिमार करणारे यांत्रिक बोट धारक आपल्याकडे येतात त्यांच्याकडून आमच्या स्थानिक मच्छिमारांना मोठा त्रास आहे. त्यांची जाळी तोडून नेने किंवा त्यांना मारहाण करण, बाणूकीचा धाक दाखवणं असे प्रकार करून येथील मच्छिमारांना उद्धवस्त करण्याचा भांडवलदारी प्रयत्न करताहेत. याच्यासाठी सरकारचा कोणताही धाक त्यांना नाही. त्यांची हद्द ठरलेली आहे मात्र सरकार त्यांच्यावर बंधन लादत नाही. मच्छिमारांच्या प्रकारानुसार त्यांच्या जलधिक्षेत्राची मर्यादा ठरलेली आहे. याबाबत सोमवंशी कमिटीनेही सरकारला अहवाल दिलेला आहे. या अहवालाच्या अटी सरकार स्वीकारत नाही असेही ते म्हणाले.

दिलीप घारे हे रापण हा पारंपरिक मच्छिमार व्यवसाय करतात. ते श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष आहेत. ते यावेळी म्हणाले गेले १० ते १२ वर्ष सातत्याने मच्छिमार एवढा मासेमारी विरोधात लढा देत आहे. शासनाने जी दखल घेतली पाहिजे ती घेतली जात नसल्याने येथील मच्छिमार मत्स्य दुष्काळाशी सामना करत आहे. हा सामना करत असताना समुद्रात ज्या आर्थिक सुबत्ता देणाऱ्या माशाच्या प्रजाती आहेत त्या या सततच्या अवैध मासेमारीमुळे कमी होत आहेत परिणामी मच्छिमार आपला रोजगार गमावून बसत आहे. या करीत सातत्याने मच्छिमार संघटना हायस्पीड गस्ती बोटींची मागणी करत आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या गस्ती बोट उपलब्ध आहेत त्या अत्याधुनिक बोटींपेक्षा कमी क्षमतेच्या आहेत. आज या किनारपट्टीवर पाहिलात तर जवळपास ८० टक्के नौका उभ्या आहेत. माशाचे साठे कमी होत असल्याने हि स्थिती ओढवली आहे असे ते म्हणाले.

मालवण दांडी गावातील संतोष प्रकाश पेडणेकर हे मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते म्हणाले म्हणाले, आम्ही समुद्रात गेल्यानंतर हायस्पीड वाले, एलईडी लाईटवाले, पर्ससीन नेट वाले हे थेट आमच्या जालावरून बोट घेऊन जातात. त्यामुळे आमचे नुकसान होते. आम्ही काही बोलत नाही कारण ते मोठ्या संख्येने असतात. दादागिरी करतात. बऱ्याचवेळा ते आमची जाळीही तोडून घेऊन जातात. सूर्य मावळला कि किनार्याच्या जवळ घुसतात. दिवसा ते २० ते २५ वाव अंतराच्या बाहेर असतात आणि रात्री ते १२ वाव अंतरावर येतात. त्यांच्या कल्पने बोटी असतात. त्यामुळे आम्ही त्यांना काही करू शकत नाही. आम्ही काही केल्यास ते आम्हाला मारून टाकतील, आमच्या बोटी फोडून टाकतील. त्यामुळे आमचे नुकसान झाले तरी आम्ही गप्प बसतो. त्यांच्या बोटी मलपी बंदर, गुजरात, मुंबई, गोवा या भागातून येतात. नजर पोचत नाही एवढ्या उंच असतात. त्यांच्या आम्ही जवळ जाऊ शकत नाही. नुकसान सोसतो आणि घरी येतो असे त्यांनी सांगितले.

मालवण मधील कृतिशील मच्छिमार महेंद्र पराडकर म्हणाले इथल्या किनाऱ्यावर एलईडी फिशिंग वाढली आहे. त्यामुळे मत्स्य जीव आणि सागरी जीवांवर त्याचा परिणाम होत आहे. किनारी भागात मोठ्या प्रमाणावर मृत कासव, डॉल्फिन, देवमासे आढळत आहेत. सिगल पक्षीही मोठ्या प्रमाणात मृत होत आहेत. तसेच अन्य राज्यातील मोठे मच्छिमार अनधिकृत पणे याठिकानि मासेमारी करतात त्यांची जाळी तुटून जाऊन घोस्ट फिसिंग सारखे प्रकार येथे घडत आहेत. त्यातून समुद्री कासव या जाळ्यात आढळत आहेत. शासनाने याबाबत कडक नियम केले पाहिजेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here