शेती, उद्योग, बेरोजगारीच्या प्रश्नावर महाराष्ट्र पिंजून काढा –  शरद पवार

0
117

विधिमंडळाच्या बाहेरही जनतेच्या विशेषत बेरोजगारीच्या प्रश्नावर महाराष्ट्र पिंजून काढा, असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना व कार्यकर्त्यांना केले. पुढील काळात शहरातील नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन पक्षवाढीसाठी नागरी भागावरही विशेष लक्ष केंद्रित करण्याचे संकेत त्यांनी दिले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात  शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निवडून आलेले आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य यांची बैठक पार पडली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शरद पवार यांनी जी एकहाती झूंज देऊन विजय खेचून आणला, त्याबद्दल सर्वच नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. शरद पवार यांनी  भाषणात निवडणुकीचा आढावा घेतला.  निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना, औद्योगिक वसाहतींमधील कारखाने बंद पडत असल्याचे, कामगार बेकार होत असल्याची माहिती मिळत होती. यवतमाळ, नाशिक जिल्ह्य़ाचा दौऱ्याच्या वेळी सांगण्यात आले की, एका महिन्यात १६ हजार कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. राज्यातील औद्योगिक वसाहतीतील ५० टक्के उद्योग बंद पडले आहेत.  कारखाने व कामगारांची रोजीरोटी वाचली पाहिजे, त्यासाठी काम करावे लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आत्महत्या वाढत आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले. दहा-पंधरा दिवसांत अयोध्यासंबंधीचा न्यायालयाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. न्यायालयाचा जो काही निकाल येईल, तो मान्य केला जाईल. परंतु त्यावर काही लोक समाजा-समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्याचा सामाजिक ऐक्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आपण सर्वानी शांतता भंग होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here