सिंधुदुर्ग – जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास मायनिंग बंदचा इशारा जरी दिला असला, तरी हे मायनिंग कधीपर्यंत बंद ठेवले जाणार याविषयी शंका आहे. त्यामुळेच मायनिंग पूर्णतः बंद करण्यात यावे या मागणीसाठी कळणेवासियांनी १४ नंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असून मनसे या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी शुक्रवारी कणकवलीत बोलताना दिली आहे.
तत्कालीन काँग्रेसच्या पालकमंत्री आणि सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांनी काही गाववाल्यांना सोबत घेत या कळणे मायनिंगला हिरवा कंदिल दाखविला होता मात्र आता त्याचे वाईट परिणाम भोगावे लागत असल्याचा टोला उपरकर यांनी लगावतानाच मायनिंगमुळे किती गावकऱ्यांना रोजगार मिळाला असा सवाल केला. ते म्हणाले,गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी बसला. कळणे येथील भूस्खलनामागे मोठ्या प्रमाणावर होत असलेले मायनिंग कारणीभूत ठरले. २० फुटांपेक्षा खाली जात स्फोट घडवले गेले. त्याचा परिणाम म्हणून हे भूस्खलन झालं आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. या नुकसानग्रस्तांना संबंधित मायनिंग कंपनीने, तिच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई तर दिली नाहीच, शिवाय साधी चौकशी करायलाही ते आले नाहीत. असा आरोपही उपरकर यांनी केला आहे.