नाथ पै, दंडवतेंच्या जिल्ह्यात मतदार विकला जातो ही शोकांतिका – परशुराम उपरकर पैसा महत्वाचा की विकास हे मतदारांनीच ठरवण्याची गरज आर्थिक प्रलोभनाला भुलून विकासाच्या प्रश्नांकडे मतदारांचे दुर्लक्ष

0
124

 

सिंधुदुर्ग – जिल्हा हा बॅरिस्टर नाथ पै आणि दंडवते यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ज्यांनी संसदेत येथील प्रश्नांना वाचा फोडली ते नाथ पै आणि दंडवते. सहकार क्षेत्रात शिवराम भाऊ जाधवांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून विकास साधणारे होऊन गेले. मात्र सध्याची निवडणूक आणि मतदारांची स्थिती पाहता नाथ पै आणि दंडवते यांना मानणाऱ्या मतदारांना खरंच दुःख वाटत असेल. सहकार क्षेत्रातील निवडणुकी चाललेला राडा प्रकार इथे याआधी पाहायला मिळाला नव्हता. खरंतर या स्थितीला जेवढे हे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार मतदारही आहेत. विकासाचे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना केवळ आर्थिक प्रलोभनांत अडकून मतदार मत’दान’ करत आहेत. हे जिल्ह्याच्या विकासाला घातक असून विकास महत्त्वाचा की पैसा हे ठरवण्याची वेळ आता मतदारांवरच आहे, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मतदारांना केले आहे.

जिल्ह्यात रस्त्याचा प्रश्न, मायनिंगचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. एका बाजूला या प्रश्नांवर आंदोलने केली जात आहेत. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या आमिषाला मतदार बळी पडत आहेत. लोकप्रतिनिधींच्या पोकळ आश्वासनांचा विचार न करता क्षणिक आर्थिक सुखासाठी विकासाची पर्वा मतदार करत नाहीत. अशावेळी सर्वसामान्यांसाठी काम करणारे आणि विकासासाठी भांडणारे कार्यकर्ते या निवडणुकीत मागे राहतात. सध्या काही ठिकाणी नगराध्यक्ष बसवण्यासाठी कोट्यावधींची बोली लावली जात आहे. दहशत प्रस्थापित करून मत मिळवले जात आहे. एका मतदाराला 30 हजार द्यावे लागतात आणि मतदार ते घेतात, ही इथली शोकांतिका आहे. अशावेळी जनतेचे प्रश्न मांडणारा प्रतिनिधी मागे राहतो. त्यामुळे लोकांना जर विकास हवा असेल तर अशा सर्वसामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मागे त्यांनी उभा राहायला हवं. निवडणुकीच्या तोंडावर घाट सुरू करण्याचं आश्वासन देणारे निवडणुकांनंतर त्याकडे पाहतही नाहीत. मेडिकल कॉलेजचा प्रश्नही तसाच प्रलंबित आहे. कुडाळचे महिला रुग्णालय गेली सात वर्षे चालू करता आलं नाही. तरीही मतदार त्याकडे कानाडोळा करतात आणि एका रात्रीत मिळणाऱ्या आर्थिक प्रलोभनाला भुलून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतात. अशा स्थितीत केवळ लोकप्रतिनिधी मोठा होतो आणि मतदार आहे त्याच ठिकाणी राहत आहे. त्यामुळे स्वतःचा विकास साधण्यासाठी मतदारांनी आपला विचार बदलून प्रामाणिक आणि होतकरू कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहून प्रलोभनाला न बोलता विकास साठी त्याला निवडून देणे ही गरज आहे. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणारे मतदार जर तयार झाले तरच या जिल्ह्याचा विकास होऊ शकेल, असे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here