सिंधुदुर्गात भात कापणी अंतिम टप्प्यात, शेतीचे मोठे नुकसान, अजूनही पंचनामे अपूर्ण शेतीचे झाले मोठे नुकसान

0
204

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. पाणथळ जमिनीत अजूनही पाणी असल्याने पिकलेले भात कापताना मोठ्या अडचणी येत आहेत. जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे साधारण १० हजार एकरातील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर अजूनही काही भागातील शेतीचे पंचनामे बाकी आहेत. यावर्षी साधारण ७० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र भात लागवडीखाली आहे. साधारणपणे ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. मनुष्यबळाचा अभाव, आर्थिकदृष्ट्या न बसणारा ताळमेळ, भातविक्रीला मिळणारा नगण्य दर यामुळे भातशेतीचे क्षेत्र मागील काही वर्षांत कमी झाले आहे. परंतु मागील दोन तीन वर्षांत शासनाने यांत्रिकीकरणावर दिलेला भर, भाताच्या दरात झालेली सुधारणा यामुळे आता पुन्हा भातशेतीत शेतकरी उतरू लागला आहे.दरम्यान यावर्षी कोरोनामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे आपापल्या गावी झालेले स्तलांतर पाहता, या चाकरमान्यांच्या मेहनतीतून जिल्ह्यात यावर्षी २५ टक्के भातशेती क्षेत्रात वाढ झाली. सुरवातीला पडलेल्या पावसाने शेती चांगली आली देखील. मात्र अखेरीस अवकाळी पावसाने या शेतीचे फार मोठे नुकसान केले. गतवर्षी ४० टक्के नुकसान अवकाळी पावसाने केले होते. यावर्षी ते ७० टक्के इतके आहे.

महेश पेडणेकर हे कणकवली तालुक्यातील लोरे गावातील शेतकरी महेश पेडणेकर सांगतात, यावर्षी आम्ही कोरोनामुळे मुद्दाम शेती केली. शेती चांगली आलीही होती मात्र अवकाळी पावसामुळे या शेतीचे मोठे नुकसान झाले. भाताच्या गोट्याला पुन्हा कोंब आले आहेत. तर काही गोटे आत काळे पडले आहेत. आम्ही कसबस जे काही हाती येत ते घेत आहोत. अजूनही शेतीत पाणी आहे. पावसाचे सावट असताना भट कापून ते शेतातच झोडून घरी घेऊन जात आहोत.

लोरे गावातील दुसरे शेतकरी जितेंद्र पेडणेकर सांगतात अजूनही पंचनाम्याची कोणीही आलेले नाहीत. सगळं होत्याच नव्हतं या पावसाने करून टाकलं. दोन खंडी भातशेती पिकणारी माझी शेती आहे. कोरोनाच्या काळात आम्ही सगळे घरात आहोत. त्यामुळे मजुरीला कुठे जाता आलं नाही. भातातून काही मिळेल याची अपेक्षा होती मात्र तेही हातच गेलं आहे. पंचनामे झाले नसल्याने नुकसानभरपाईचीही काही अपेक्षा दिसत नाही असं ते म्हणाले.

दरम्यान जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळेल याचीही शास्वती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here