पणजी – भारत-चीन सीमेवर चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानाना वंदन करण्यासही भाजप सरकारने आडकाठी आणणे हे अत्यंत दुर्देवी आहे असे सांगुन, काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकारचा निषेध केला व केंद्रातील मोदी सरकारने भारत- चीन सीमेवरील सत्य परिस्थीती जनतेसमोर ठेवावी अशी मागणी केली.
काॅग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेल्या आवाहनाला स्मरुन मोदी सरकारने देशवासीयांना विश्वासात घेऊनच चीनला धडा शिकवावा अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली. काॅंग्रेस पक्ष देशहिताच्या दृष्टिकोनातुन सरकारला पुर्ण सहकार्य करेल असे ते म्हणाले .
गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती तर्फे आज आझाद मैदानावर “शहीदोकों सलाम” कार्यक्रमात भारत-चीन सीमेवर हुतात्मे झालेल्या शहीदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, खासदार फ्रांसिस्को सार्दिन, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, युवा काॅंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो तसेच इतर काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
भारतच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले सैनीक सक्षम असुन, चीनने परत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यास समर्थ असल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना सांगीतले. देशाचे रक्षण करताना ज्या सैनीकानी आपले बलिदान दिले त्यांना मी वंदन करतो असे त्यानी यावेळी सांगीतले व देश सैन्यदलाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे सांगुन, प्रधानमंत्र्यानी काहीच दडपुन न ठेवता सर्व देशवासीयांना विश्वासात घ्यावे अशी मागणी केली.
खासदार फ्रांसिस्को सार्दिन यांनी सर्व शहीदाना आदरांजली वाहुन, देशाच्या रक्षणासाठी सर्व भारतीय एक असल्याचे सांगीतले.
सुरवातीला हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करुन तसेच मेणबत्ती व पणती पेटवुन सर्व शहीदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.