राजकीय टीकेनंतर आमदार नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? राजकीय विरोधकांना केला प्रश्न

0
109

सिंधुदुर्ग- गेले दोन दिवस गाजत असलेल्या नांदगांवातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेतील वक्तव्याबाबत आमदार नितेश राणे ठाम आहेत. या संदर्भात त्यांनी आज कणकवलीतील प्रहार भवनात जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. मी काहीही चुकीचे बोललो नाही.जे बोललो ते अधिकार वाणीने बोललो. असे ते म्हणाले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी आपल्या राजकीय विरोधकांना केला.

जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. तेव्हा माझ्या विचाराचा सरपंच निवडून दिला नाहीत तर विकास निधी देणार नाही असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्यावरून राज्यभर टीकेला त्यांना सामोरे जावे लागले होते.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या धमकीच्या वक्तव्याचे समर्थन करत त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे.कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.ते म्हणाले,मी केलेले वक्तव्य त्यात काही चुकीचं नाही. माझं आणि मतदारांच अतूट आणि कौटुंबिक नाते. मी हक्काने ते वक्तव्य केले आहे. याही पुढे जो गाव आमच्या पुरस्कृत पॅनलला निवडून देईल, जे सरपंच निवडून देतील त्यांच्या गावच्या विकासाची जबाबदारी मी घेतो. असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.आदित्य ठाकरेंनी काल नितेश राणेंच्या धमकीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शी.. अशी प्रतिक्रिया दिली होती.त्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी त्यांची खिल्ली उडवत आदित्य ठाकरे यांना अडचणीचे प्रश्न विचारू नका पॅंटी मध्ये त्रास होईल. असे प्रश्न विचारू नका बिचाऱ्या लहान मुलाला तुम्ही त्रास देता .बघा कसा शी म्हणून आई जवळ पळाला छोट्या मुला सारखा.असा टोला लगावला.

वैभव नाईक यांना विकास करणारा आमदार किंवा जनतेत मिसळणारा आमदार म्हणून ओळखलं जातं नाही तर सिंधुदुर्गातला राणे विरोधक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.राणेंवर बोलला नाही तर त्याची आमदारकी राहणार नाही असा टोला नितेश राणे यांनी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर लगावला आहे.नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेऊन नाईक यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, वैभव नाईक ठाकरे गटासोबत किती काळ राहतात हे पाहावं लागेल.माझ्यावर पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा त्यांनी acb ला आपल्या संपत्तीची माहीती द्यावी. असेही ते यावेळी म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधक आहेत. कुठलीही केंद्राची योजना अथवा निधी ते आणू शकत नाहीत. आमदार वैभव नाईक हे विरोधात आहेत. गेल्या साडे पाच महिन्यात आमदार नाईक हे आपल्या मतदारसंघामध्ये एक रूपयाचा तरी निधी आणू शकले आहेत का? याचे उत्तर त्यांनी अवश्य द्यावे . ग्रामपंचायतींना ग्रामविकास मंत्रालयामार्फत निधी येतो. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे आहेत. गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते बांधकाम खात्याकडून होतात. हे खातं रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तर सर्व निधी अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून पाठवला जातो. हे खातं देखील भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निधी आणूच शकत नाहीत. असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here