सिंधुदुर्ग – दिल्ली , गुजरात , राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून प्रवेश देण्याचा शासकीय निर्णय झाला आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर बांदा सटमटवाडी येथील चेकपोस्ट वर आजपासून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल आणि आरोग्य विभागाची संयुक्त पथके सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे नेमण्यात आली आहेत.
याठिकाणी प्रवाशांच्या गाडीची आणि वैयक्तिक माहितीची नोंद केली जाते . तसेच प्रत्येक प्रवाशाची थर्मल गन ने शारीरिक तापमान तपासले जाते . 99 अंश पेक्षा जास्त शारीरिक तापमान असेल तर जवळच्या शासकीय रुग्णालयात अधिक तपासणी तथा उपचारासाठी पाठवले जात आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विविध सावधानतेच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत त्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही आरोग्य तपासणी होत आहे.
यावेळी बोलताना सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत बांदा येथे आम्ही प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात घेतो. प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. ज्यांचे शारीरिक तापमान 99 अंशापेक्षा जास्त आहे त्यांना एकतर पुन्हा गोव्यात पाठवतो किंवा त्यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजन रॅपिड टेस्ट करणार आहोत. तिथे ते पॉझिटिव्ह सापडले तर त्यांना आम्ही शेर्ले येथे सीसीसी सेंटरमध्ये दाखल करणार आहोत. असे त्यांनी सांगितले.