महाराष्ट्रातील ‘महाराजकीय नाट्या’बाबत सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच बुधवार दि.27 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत उभय पक्षांकडून सुमारे 80 मिनिटे चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने याबाबत आज दि. 26 रोजी निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते. अखेर यावर आज निकाल आला असून, यामुळे या महानाट्याच्या शेवट आता विधानसभेत होणार आहे.
राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याचा युक्तिवाद भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे करण्यात आला आणि 30 नोव्हेंबरची बहुमत चाचणीची तारीख कायम राखण्याची बाजू मांडण्यात आली होती. तर, महाआघाडीच्या वतीने, सभागृहातील बहुमत चाचणी हा एकमेव निकष असून, पुढील चोवीस तासांत त्याद्वारे निर्णय केला जावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. ही मागणी न्यायालयाने मान्य करत उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच या सर्व घडामोडींचे लाईव्ह चित्रिकरण करावे लागणार आहे. यासाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नियुक्ती करा.
राज्यपालांनी फडणवीस यांना सरकारस्थापनेसाठी दिलेले निमंत्रण, सरकारस्थापनेसाठी आवश्यक त्या बहुमताचे फडणवीस यांचे दाव्याचे पत्र व अजित पवार यांचे पाठिंब्याचे पत्र, ही तीन कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. ती सादर करण्यात आली होती. भाजप व फडणवीस यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी, तर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी महाआघाडीची बाजू मांडली होती.