विश्व हिंदू परिषदेने मांडली भूमिका, मशिदीसाठी अयोध्येबाहेरच जमिन द्यावी
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारकडून स्थापन होणाऱ्या न्यासाचे अध्यक्षपद संघाचे सरसंघचालक असू नये, वक्फ बोर्डाला मशिदीसाठी दिली जाणारी जागा अयोध्येच्या पूर्वीच्या सीमेबाहेर देण्यात यावी आणि राममंदिराच्या निर्मितीसाठी यापूर्वी निश्चित झालेले मॉडेल कायम रहावे, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने शनिवारी नागपुरातून मांडली.
प्रस्तावित रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्षपद सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी काही संतांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी अध्यक्षपद सरसंघचालक भागवत यांच्याकडे असू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले. संघाचा स्वयंसेवक या नात्याने ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे राय यांनी यावेळी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या निवाड्यात सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एक जागा देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. ती पाच एक जागा बोर्डाला अयोध्या नगर पालिकेच्या जुन्या सीमेबाहेरच देण्यात यावी, अशी आमची मागणी असून त्यामुळे भविष्यातही सौहार्दाचे वातावरण कायम राहील असा आमचा यामागील विचार असल्याचे राय यांनी सांगितले.
प्रस्तावित रामजन्मभूमी मंदिराचे मानचित्र तीस वर्षांपूर्वी तयार केले गेले. देशभरात कोट्यवधी लोकांच्या घरांमध्ये तेच मानचित्र आहे. त्यामुळे मंदिराच्या निर्मितीसाठी तेच कायम ठेवण्यात यावे,
मंदिराच्या निर्मितीसाठी कोरिव काम करून तयार करण्यात आलेल्या दगडांचाच वापर व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे राय यांनी सांगितले.
रामजन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात कुणाचाही विजय वा पराजय झाला नसल्याची आमची भावना आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे पूर्वज पूर्वी एकच होते. विदेशी आक्रमकाने भारताच्या सन्मानाला धक्का पोहोचविला होता. हा निवाडा म्हणजे त्या अवमानाचे परिमार्जन आहे,असे राय म्हणाले. या निवाड्यानंतर दाखल होत असलेल्या पुनर्विचार याचिकांमध्ये कुठलीही नवी बाब नाही. ही न्यायिक बाब आहे. त्यामुळे त्यातून काहीच साध्य होणार नाही, असेही राय म्हणाले.