सिंधुदुर्ग – तिलारी कॅनॉल दुरुस्तीसाठी ३५ कोटी देण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान, लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिल्या आहेत.
तिलारी प्रकल्प हा सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात असून प्रकल्पाचे कालवे पूर्ण होऊन सुमारे ३० ते ३५ वर्षे कालावधी लोटला आहे.
हे कालवे प्रामुख्याने मऊस्तर मातीमधून गेल्यामुळे सन २०१९-२० च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका त्यांना बसला होता.
ज्या ठिकाणी डोंगरकडा ढासळून कालव्यातील प्रवाह बंद होतो, त्या ठिकाणी क्षेत्रीय परिस्थितीनुसार मंजुषा पेटीचे बांधकाम करणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे तसेच कालवा गळतीच्या ठिकाणी कालवा अस्तरीकरण करणे.
अशा प्रतिबंधक उपाययोजनेच्या नवीन व दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे ३५ कोटीच्या रकमेची मागणी शासनस्तरावर करून पाठपुरावा करण्यात आला होता.
पुढील दौऱ्यात बांदा, तिलारी येथील पाहणी करण्यात येणार आहे. त्यासोबतच विमानतळाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.