गोवा-महाराष्ट्र प्रशासनात समन्वय नसल्यामुळे “त्या” युवकाला जीव गमवावा लागला सिंधुदुर्गवासीयातून व्यक्त होतेय नाराजी

0
43

 

सिंधुदुर्ग – गोवा-महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात समन्वय नसल्यामुळे हातावर पोट घेऊन गोव्यात कामासाठी जाणाऱ्या वेंगुर्ले येथील “त्या” युवकाला आपला जीव गमवावा लागला अशी नाराजी आज व्यक्त होत आहे.

गाळेल येथे कोसळलेल्या दरडीच्याखाली “तो” युवक सापडल्याची भीती आहे.दरम्यान आरटीपीसीआरची सक्ती आणि दुसरीकडे गोव्यात जाण्यासाठी असलेली बंदी या दोन्ही गोष्टींमुळे हा प्रसंग शेकडो युवकांवर ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे आता तरी दोन्ही बाजूच्या राज्यकर्ते व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,व गोव्यात कामाला जाणाऱ्या युवकांसाठी मुख्य रस्त्याची वाट मोकळी करून द्यावी,अशी मागणी बेरोजगार तरुण वर्गातून होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारांचे लोंढे पोटासाठी गोव्याच्या दिशेने जातात.गेल्या काही काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआरची सक्ती केल्यामुळे छुप्या मार्गाने गोव्यात जाण्यासाठी अनेक युवक प्रयत्न करत असतात.

घरी राहिलो तर घर चालवणे कठीण, आणि गोव्यात राहिलो तर तेथे परवडत नाही,अशी द्विधा मनस्थिती असल्यामुळे दुचाकीने अपडाऊन करण्यामागे या युवकांचा प्रयत्न असतो.

या सर्व परिस्थितीत नियमित गोव्यात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आरटीपीसीआरची सक्ती करू नये,अशी मागणी या युवकांकडून करण्यात आली.

परंतु मागणीचा पाठपुरावा करतो,तसेच ती बंद करतो,असे सांगून येथील राज्यकर्त्यांनी “त्या” शेकडो युवकांची बोळवण केली आहे.त्यामुळे छुप्या मार्गाने गोव्यात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

असाच प्रयत्न वेंगुर्ला-मठ येथील “तो” युवक करत असताना त्याला काळाने गाठले.गाळेल येथील भला मोठा डोंगर त्यावर कोसळल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.

त्याचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही.तो काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर गोव्यात जाणार्‍या मुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशाप्रकारे हातावर पोट असणाऱ्या युवकांसाठी आता येथे राज्यकर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

आणि सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनाने त्यांना गोव्याच्या वाटा उघड करून देणे गरजेचे आहे,अशी मागणी आता सिंधुदुर्ग वासियांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here