कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. दादर रेल्वे स्टेशनवरून आखूड प्लॅटफॉर्मवरून सुटणारी १५ डब्यांची तुतारी एक्स्प्रेस ११ नोव्हेंबरपासून १९ डब्यांची कायम सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत कोकणी माणसाची खास मैत्रीण बनलेली दादर-सावंतवाडी तुतारी गाडी सोडण्यासाठी मुंबईत जागा मिळत नव्हती. ही प्रत्येक कोकणी माणसाला वेदना देणारी बाब होती. सीएसटीवरून परप्रांतात जाणाऱ्या शेकडो गाडय़ांना ऐसपैस जागा काय मिळते? असा संतप्त सवाल कोकणी माणसात होत होता. कोकणी माणसासाठी सावंतवाडीपर्यंत मुंबईतून रात्रीची हक्काची एकमेव तुतारी ट्रेन दिली गेली. पण देताना हात आखडता घेतला. त्या गाडीला दादर येथे उभे राहायला आखूड प्लॅटफॉर्म दिला गेला. १५ डब्यांपेक्षा जास्त डब्यांची ट्रेन येथे उभी राहू शकत नव्हती. कमी डब्यांमुळे प्रवास चिरडून व्हायचा. या ट्रेनचे डबे वाढवून मिळावेत म्हणून मागणी होऊ लागली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते डी. के. सावंत यांनी आंदोलन छेडले होते. नंतर सणासुदीला तात्पुरते डबे वाढविले जात होते. कायमस्वरूपी डबे वाढवा म्हणून मागणी होती. आता त्यात चार डबे वाढविले आहेत. ११ नोव्हेंबरपासून १९ डब्यांची धावेल. २ एसी-१, ३ एसी -२, स्लीपर ८, जनरल ६, एसएलआर २ असे एकूण १९ डबे असतील. ही ट्रेन दादरच्या ५ नंबर प्लॅटफॉर्मवरून सुटेल अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.